लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभेत करा : घनश्याम मुलचंदानी
बल्लारपूर येथे कांगेस कार्यकर्ता मेळावा : बुथ स्तरीय कार्यकर्त्यांचे आभार संमेलन
श्रेयश वानखेडे: काँग्रेसच्या तळगाळातील कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ईतिहास घडविला.खासदार प्रतिभा धानोरकर यांना या विधानसभा क्षेत्राने ४८ हजार २०० मतांची आघाडी दिली.याचे श्रेय काँग्रेसच्या व महाविकास आघाडीच्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना जाते.आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीची पुनरावर्ती करा,असा सल्ला काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनी बूथ स्तरीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
बल्लारपूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने एकदंत सभागृहात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामगिरीचे आभार संमेलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना घनश्याम मुलचंदानी बोलत होते.
यावेळी मंचावर युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शंतनू धोटे,जि. प. माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदा उपरे,शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रोजिदा ताजुद्दीन,माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, दिलीप चौधरी,राजू झोडे,शहर काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल करीम, काँग्रेसचे माजी गटनेते देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्ष सुनंदा आत्राम,अनिल वाग्दरकर, पवन मेश्राम, भास्कर माकोडे, नरसिंग रेब्बावार आदीं उपस्थित होते.
यावेळी दिलीप चौधरी म्हणाले,राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी समर्थपणे निवडणुकीला समोरे जाणार आहे. उमेदवार कोणीही असला,तरी आपण सर्वांनी बल्लापूर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करावा. राजू झोडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन अब्दुल करीम यांनी केले.यावेळी बल्लारपूर शहरातील व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची उपस्तिथी मोठ्या संख्येनी होती.
घनश्याम मुलचंदानीना आमदारकीचे वेध
बल्लारपूर शहरात पार पडलेला काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा. हा एका प्रकारे शक्तीप्रदर्शन मेळावा असल्याचे दिसून आले.लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली मतांची आघाडी भावी काँग्रेस व महाविकास आघाडी च्या उमेदवारांसाठी आशा पल्लवीत करणारी आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी यांच्यात लढत झाली होती.त्या निवडणुकीत मुनगंटीवारांना १ लाख 3 हजार ७१८ मते,तर मुलचंदानीना ६० हजार ११८ मते मिळाली होती. तेव्हा घनश्याम मुलचंदानीचा ४३ हजार ६०० मतांनी पराभव झाला होता.आता त्यांना मागील पराभवाचा वचपा काढण्याची संधी दिसून येत असल्याने मेळाव्यातून त्यांना बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून आमदारकीचे वेध लागल्याचे दिसून आले आहे.