लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब जनता, आदिवासी बांधव मुनगंटीवारांना त्यांची जागा दाखवतील, राजू झोडे

चंद्रपूर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची विनाकारण उधळण करणाऱ्या, जिल्ह्यात एकही नवीन उद्योग न आणणाऱ्या तसेच आदिवासी बांधवांच्या शेती उध्वस्त करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब जनता, आदिवासी बांधव त्यांची जागा दाखवून देतील अशी टीका उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.दरम्यान भाजपचे कोणतेही कार्यकर्ते मत मागायला आल्यास त्यांना हाकलून लावा असे आवाहन सुद्धा नागरिकांना केले आहे.
चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, पोंभुरणा तालुक्यात ठिकठिकाणी भीषण पाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.इतकेच नव्हे तर जिल्ह्यात आजपर्यंत एकही मोठे उद्योग न आल्याने सुशिक्षित बेरोजगारांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.तर गोरगरीब आदिवासी बांधवांच्या शेतजमिनी उध्वस्त करण्याचे काम सुरू आहे.सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक वर्षांपासून आहेत.मात्र त्यांनी साधी पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली नाही, शिवाय एकही उद्योग आणला नाही.जनतेच्या कोट्यवधी रुपयांची उधळण करून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात मग्न आहेत.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना मतदार त्यांची जागा निश्चित दाखवून देणार असल्याची टीका राजू झोडे यांनी केली आहे.तसेच भाजपचे कार्यकर्ते मत मागायला आल्यास त्यांना सर्व समस्या लक्षात आणून देऊन त्यांना हाकलून लावा असे आवाहन सुद्धा झोडे यांनी मतदारांना केले आहे.