अनाथ मनोरुग्णांच्या सेवेसाठी कार्य करणारे शुभम पसारकर राज्यस्तरीय “महाराष्ट्र महागौरव” पुरस्काराने सन्मानित
श्रेयश वानखेडे:
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात गेली अनेक वर्षे रस्त्यावरचे, बेघर, भिक्षेकरी, अनाथ आणि मनोरुग्ण बांधवांचे पुनर्वसनाचे (पुन्हा जीवनात आणण्याचे) काम करणारे शुभम राजू पसारकर यांना “महाराष्ट्र महागौरव २०२५” हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.
हा गौरव सोहळा २५ मे रोजी पुणे येथे पार पडला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आयुष्यमान भारत महाराष्ट्र राज्य समिती अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या उपस्थितीत पसारकर यांना मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
‘दिव्यवंदना आधार फाउंडेशन’ या संस्थेमार्फत शुभम पसारकर हे चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागात अनाथ व मनोरुग्णांचे पुनर्वसन करत आहेत. त्यांच्या या समाजसेवेची दखल घेऊन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांनी त्यांची पुरस्कारासाठी निवड केली.
पुरस्कार मिळाल्यानंतर पसारकर यांनी सांगितले की, “हा सन्मान मला पुढे आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा देतो. अनाथ आणि रस्त्यावरचे मनोरुग्ण हेही आपलेच आहेत. त्यांना पुन्हा समाजात जागा मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहीन.”
या पुरस्काराबद्दल अनेक सामाजिक संस्था, नागरिक व सहकाऱ्यांनी शुभम पसारकर यांचे अभिनंदन केले आहे.