भक्ती हाच भागवत ग्रंथाचा मुख्य सार _ स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन.
जगन्नाथ पुरी येथे श्रीमद् भागवत महापुराण कथेची उत्साहात सांगता.
Jyotsna Wankhede : दि.1जानेवारी श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी धाम येथील इंद्रद्युम्ननगरीमध्ये आयोजित श्रीमद् भागवत महापुराण कथेची सांगता गुरुवारी, १ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात झाली. मराठवाडा आणि विदर्भातील भाविकांनी आयोजित केलेल्या या ज्ञानयज्ञाच्या सांगताप्रसंगी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी भक्ती आणि ज्ञानाचा महिमा विशद केला. कथेचा सार सांगताना स्वामीजी म्हणाले की, संसार सतत परिवर्तनशील आहे, परंतु आपले अंतःकरण आणि त्यातील सत्य कधीही बदलत नाही. श्रीकृष्णाच्या चरण कमलांची भक्ती हाच संपूर्ण श्रीमद् भागवत ग्रंथाचा मुख्य सार आहे. भक्तीसोबत येणारे ज्ञान आणि वैराग्य हे मानवी जीवनातील अज्ञान व मृत्यूची भीती दूर करतात. ज्या परंपरेने आपल्याला हा भक्तीचा दिवा दिला आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहून भक्तीचा मार्ग कधीही सोडू नये, असे आवाहन त्यांनी आशीर्वचनपर बोलताना केले. राधेश्याम चांडक (बुलडाणा), नंदकिशोर झंवर (रिसोड), डॉ. विनोद मंत्री (परभणी) आणि नंदकिशोर बाहेती (सेलू) व त्यांच्या परिवाराने या सोहळ्याचे २६ डिसेंबर २०२५ पासून विविध कार्यक्रमांसह नेटके नियोजन केले होते.३१ डिसेंबरच्या मध्यरात्री सेलू येथील श्री रोकडिया हनुमान चालीसा मंडळाच्या भाविकांनी १०८ वेळा सामूहिक हनुमान चालीसा पठण करून नवीन वर्षाचे स्वागत केले. या प्रसंगी स्वामीजींनी सांगितले की, हा दिवस केवळ इंग्रजी नवीन वर्षाचा प्रारंभ नसून, अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा दोन वर्षांचा पूर्तता दिवस म्हणजेच प्रतिष्ठा द्वादशी आहे. हा दिवस भारताच्या आत्मविश्वासाचा आणि गौरवाचा आहे. या पावन प्रसंगी भारतवर्ष आता एका नवीन पर्वात प्रवेश करत आहे.
राष्ट्र कल्याणाचे चार संकल्प स्वामीजींनी नवीन वर्षात राष्ट्र कल्याणासाठी चार संकल्प घेण्याचे आवाहन केले. यामध्ये पूर्वजांच्या बलिदानाची जाणीव ठेवण्यासाठी परंपरेचा बोध, निसर्ग रक्षणासाठी पर्यावरण रक्षण, स्वतःचे कुटुंब व राष्ट्रासाठी सुरक्षेची सिद्धता आणि जाती-भेद विसरून संघटित होण्याची समरसता या चार गोष्टींचा समावेश आहे. नवीन वर्षात हनुमानजींच्या गुणांचे स्मरण समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाप्रभु जगन्नाथांची भक्ती सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि चैतन्य घेऊन येवो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. या सोहळ्याला मराठवाडा व विदर्भातील शेकडो भाविक उपस्थित होते.