बल्लारपूर मधील पोलीस बूथ बनले शोभेची वस्तू
श्रेयश वानखेडे : चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाकडून तीन महिन्यापूर्वी शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलीस बूथ उभारण्यात आले होते. बल्लारपूर शहरात हे बूथ तत्कालीन पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी विशेषतः मागणी करून उपलब्ध करून घेतले होते, जेणेकरून ट्रॅफिक पोलीसांना वाहतूक नियंत्रणात मदत होईल.
शहराच्या मुख्य रस्त्यांवर उभे असलेले हे बूथ वापराअभावी धूळ खात उभे आहेत. विशेष म्हणजे, ट्रॅफिक पोलीस या बूथकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत व त्यांचा प्रत्यक्ष वापर करत नाहीत.
स्थानिक नागरिकांनी या बाबतीत नाराजी व्यक्त केली असून, सार्वजनिक निधी खर्चून उभारलेली ही सुविधा न वापरता पडून राहिल्यामुळे प्रशासनाच्या नियोजन क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रशासनाकडे मागणी होत आहे की, हे बूथ वाहतूक पोलीस यांना त्यांचा नियमित वापर करण्याचे आदेश द्यावेत. शहरात वाढती वाहतूक, बेशिस्त पार्किंग, व रस्त्यावरची अनागोंदी पाहता, अशा प्रकारच्या सुविधांचा प्रभावी वापर होणे अत्यावश्यक आहे.