Friday, July 31, 2026
spot_img
HomeChandrapurसायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करा - गृह राज्यमंत्री...

सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करा – गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करा – गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेचा आढावा

चंद्रपूर( जीमाका): आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्याचा चांगला आणि वाईट अशा दोन्हीप्रकारे उपयोग करता येतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक सायबर गुन्हे वाढत असून सामान्य नागरिकांचे हक्काचे पैसे परस्पर वळविण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. सोबतच अंमली पदार्थाची तस्करी, वाहतूक, विक्री आणि सेवन ही सुध्दा अतिशय गंभीर बाब आहे. या दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिस यंत्रणेने विशेष लक्ष देऊन सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थ संबंधित गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

पोलिस अधिक्षक कार्यालय येथे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, अतिरिक्त्‍ पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक आदी उपस्थित होते.

सायबर फसवणुकीचे तसेच अंमली पदार्थसंबंधित गुन्हे, हे अतिशय गंभीर विषय आहेत, असे सांगून गृह राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामान्य माणसांच्या हक्काचे पैसे परस्पर दुस-या खात्यात वळविले जातात. त्यामुळे पीडितांचे मोठे आर्थिक नुकसान होते. सोबतच त्यांना मनस्ताप सुद्धा सहन करावा लागतो. या पैशाची परतफेड करणे एक आव्हान असते. त्यामुळे सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत समाजात जास्तीत जास्त जनजागृती करावी. जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी, वाहतूक, विक्री व सेवन होणार नाही, याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. आपापल्या पोलिस स्टेशनच्या क्षेत्रात असे गुन्हे घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

चंद्रपूर हा औद्योगिक आणि राज्याच्या सीमेवर असलेला जिल्हा आहे. त्यामुळे गोवंश तस्करी / हत्या रोखण्यासाठी सीमेवरील नाक्यांवर कडक तपासणी करावी. आवश्यक असल्यास तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियेाजन करावे. नाक्यावरील पथकांद्वारे योग्य कारवाई होते की नाही, हे तपासण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांनी तेथे अकस्मिकपणे भेटी द्याव्यात. गावागावातील पोलिस पाटलांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना, त्यांच्या जबाबदा-या आणि त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, याबाबत मार्गदर्शन करा, अशा सुचना गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी केल्या.

वेगवेगळ्या घटनेत नागरिकांचे हरविलेले 105 मोबाईल, गत एका महिन्यात पोलिसांनी शोधून काढले आहेत. सदर मोबाईल गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आले. यात अनिकेत दुमारकर, प्रेम किटे, मंगेश फटिंग आदींचा समावेश होता.

पोलिसांनी संवादी व्हावे : महिला आणि तरुण मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक अतिशय महत्वाचे आहे. या पथकाने बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात तसेच महिलांची गर्दी असलेल्या इतरही ठिकाणी गस्त वाढवावी. जेणेकरून महिलांना सुरक्षित वाटेल. तसेच पोलिस यंत्रणेने आपले गुप्त खब-यांचे जाळे वाढवावे. नागरिकांशी नियमितपणे संवाद साधला तर ब-याच गोष्टींची माहिती पोलिसांना प्राप्त होते. वरिष्ठ पोलिस अधिका-यांसोबत इतर पोलिसांचा आणि कर्मचा-यांचासुध्दा चांगला संवाद असणे गरजेचे आहे, असेही गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

पोलिस अधिक्षकांनी केले सादरीकरण : यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांनी सादरीकरणातून उपलब्ध मनुष्यबळ, जिल्ह्यातील क्राईम रेट, दाखल गुन्ह्यांची माहिती, अपघात व त्यात होणा-या मृत्युची संख्या कमी करण्यात पोलिसांना आलेले यश, अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, मोक्काची प्रकरणे, गोवंश प्रकरणे, तडीपारची प्रकरणे, सायबर गुन्हे, पासपोर्ट व्हेरिफिकेशन, चारित्र्य प्रमाणपत्र वाटप, स्वसंरक्षणासाठी घेण्यात आलेले प्रशिक्षण, वाहतूक नियम जनजागृती आदींबाबत माहिती दिली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page