मुल आणि सावली तालुक्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आ. सुधीर मुनगंटीवार
मुल आणि सावली तालुक्यातील धान पिकांना दिलासा देण्यासाठी असोलामेंढा प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी
पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची आ. मुनगंटीवार यांनी तातडीने दखल; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्वरित कार्यवाहीची मागणी
*Jyotsna Wankhede* : शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहणारे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांप्रती असलेली आपली आत्मीयता, बांधिलकी आणि संवेदनशीलता कृतीतून अधोरेखित केली आहे. मुल तालुक्यातील नांदगाव, बेंबाळ व जुनासुर्ला तसेच सावली तालुक्यातील सावली, पाथरी, निमगाव, व्याहाड, कापसी, खेडी व साखरी परिसरात पावसाने मोठा खंड पडल्याने धानाची रोपे व आवत्या करपण्याच्या स्थितीत पोहोचल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना पत्र पाठवून असोलामेंढा प्रकल्पातून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी केली आहे.
यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या आशा आणि विश्वासाने धानाची लागवड केली. मात्र, पावसाने अचानक दडी मारल्याने मुल व सावली तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पाण्याअभावी धानाची रोपे करपू लागली असून पिकावर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधत शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, असोलामेंढा प्रकल्पातून तातडीने पाणी सोडल्यास मुल तालुक्यातील नांदगाव, बेंबाळ, जुनासुर्ला तसेच सावली तालुक्यातील सावली, पाथरी, निमगाव, व्याहाड, कापसी, खेडी व साखरी परिसरातील धान पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे कोणताही विलंब न करता संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देऊन तातडीने पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ विधानसभेत मांडण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या अडचणीच्या प्रत्येक क्षणी प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे, हीच लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी असल्याची भूमिका आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने कृतीतून सिद्ध केली आहे. शेतकऱ्यांचे उभे पीक वाचावे, त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठीच त्यांनी हा तातडीचा पुढाकार घेतल्याचे या पत्रातून स्पष्ट होते.