विद्यार्थ्यांनो, दररोज नवीन ज्ञान आत्मसात करा !
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद !


यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गुणवंत विद्यार्थ्यांना आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत यशस्वी व्हावे, असा आशीर्वाद कन्यका मातेकडे मागतो, असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. ‘विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने, परीश्रमाने गुणपत्रिकेत गुणवंत हा शिक्का लावला आहे, याचा अभिमान आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाकडून या विद्यार्थ्यांचा गौरव केला जात आहे. मात्र प्रत्येक पावलावर गौरव होईल, समाजाला आपला अभिमान वाटेल, यादृष्टीने कष्ट घ्या. आपले हस्ताक्षर ऑटोग्राफमध्ये बदलले पाहिजे, एवढी भरारी घ्या,’ असे आवाहनही ना. श्री. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
‘आई, आजी आणि शिक्षक आपल्याला अनके छोट्या छोट्या कथा सांगतात. त्या कथांचा मतितार्थ समजून घ्यावा. कारण त्यातूनच आपल्या जीवनाला दिशा मिळत असते. यशस्वी लोक वेगळे काम करीत नाही, ते वेगळ्या पद्धतीने काम करीत असतात. ज्याने बल्बचा शोध लावला त्या थॉमस अल्वा एडिसनला प्रयोग यशस्वी होण्यापूर्वी ५० हजार प्रयोग करावे लागले होते. त्यानंतर त्याचा प्रयोग यशस्वी झाला. बल्बचा शोध लागल्याची माहिती पत्रकारांना देत असताना एका पत्रकाराने प्रश्न केला की ‘५० हजार प्रयोग केल्यानंतरही यश आले नसते तर तुम्ही काय केले असते?’ त्यावर एडिसनने उत्तर दिले की ‘अपयश आले असते तर मी इथे तुमच्यापुढे बसलो नसतो, पुन्हा एकदा पुढच्या प्रयोगाची तयारी सुरू केली असती.’ आपले जीवन असे असले पाहिजे. न थांबता, हताश न होता, यशापयशाची चिंता न करता सदैव प्रामाणिक प्रयत्न करीत राहिले पाहिजे,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार विद्यार्थ्यांना म्हणाले.
‘दहीहंडीचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा’
एकदा एका माणसाने जहाजामध्ये खेकडा भरलेले टोपले ठेवले आणि त्यावर काहीच झाकले नाही. लोक म्हणाले झाकण लावा, नाहीतर खेकडे बाहेर येतील. त्यावर तो म्हणाला ‘हे सगळे महाराष्ट्रातील खेकडे आहे. ते एकमेकांचे पाय ओढतील आणि कुणालाही वर येऊ देणार नाही.’ ही कथा आपण ऐकली आहे, पण ही अर्धवट आहे. याच महाराष्ट्रात दहीहंडीसाठी लोक एकमेकांना आधार देतात आणि त्यांच्यातील एक जण हंडी फोडून सर्वांना प्रसाद देतो. हाच आदर्श आपल्याला डोळ्यापुढे ठेवायचा आहे आणि आयुष्याचा प्रवास करायचा आहे, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
|
|









