आंतरजातीय विवाह जोडप्याचे दुःखद अंत:
विवाहानंतर छोट्याशा वादाला वेदनादायक वळण, तीन महिन्यांनी जोडप्याचा दुःखद अंत
श्रेयश वानखेडे:
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा गावात शनिवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. तीन महिन्यांपूर्वी समाजाचे बंधन झुगारून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याने छोट्याशा वादातून आत्महत्या केली. प्रकाश शरबत ठेंगणे आणि उषा प्रकाश ठेंगणे अशी मृतांची नावे आहेत.
प्रकाश ठेंगणे हे गोंडपिपरी तालुक्यातील इल्लूर गावातील उषाच्या प्रेमात पडले होते. दोघांनीही समाजाची पर्वा न करता तीन महिन्यांपूर्वी लग्न केले. शनिवारी २४ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता काही मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. चिडलेल्या उषा विहिरीच्या दिशेने निघाली आणि प्रकाशही तिच्या मागे गेला. अचानक उषाने विहिरीत उडी घेतली. पत्नीला वाचवण्यासाठी प्रकाशनेही विहिरीत उडी घेतली, मात्र दोघांचेही करुण अंत झाले.
घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.