तब्बल 41 वर्षानंतर झाल्या भेटीगाठी स्नेहमीलन सोहळ्यात भारावले गुरुजन -विद्यार्थी
श्रेयश वानखेडे:
आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी. दोन वर्षांपूर्वी एस.एस.सी 1983 हा व्हाट्सअप ग्रुप तयार झाला. संवादाची देवाणघेवाण होत असताना 1983 च्या एस.एस.सी च्या विद्यार्थ्यांनी नुकतेच दोन दिवशीय स्नेहमिलन सोहळा पार पाडला. गुलमोहर मित्रपरिवार तर्फे आयोजित या कार्यक्रमात त्याकाळी शिकलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा औक्षवंत करून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि याच बॅचचे विद्यार्थी प्रा. डॉ. विजय सोरते लिखित “मी: एक अंधारटिंब” कवितासंग्रह भेट देऊन सत्कार केला. हे सर्व महात्मा गांधी विद्यालय आरमोरी येथील विद्यार्थी आहेत. या सोहळ्यात यशवंतराव सोरते, ताराचंद नागदेवे, पांडुरंग सोनकर , ए. एच. खान, पांडुरंगजी ठाकरे ,मधुकरराव भोयर, वसंतराव खोब्रागडे आणि सुरेश कुंभारे या सत्कारमूर्तींनी भावविवश होऊन सत्कार स्वीकारला.
प्रारंभी दिवंगत शिक्षक आणि दिवंगत विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गुरुजनांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. गुरुजन भावना व्यक्त करताना म्हणाले, “आमच्या शिक्षकी पेशाची ही पावती असून हा क्षण आयुष्यभर विसरणार नाही. विद्यार्थी घडावा त्याचे जीवन सुगंधमय व्हावे म्हणून आम्ही शिक्षा केली. तुम्ही मोठमोठ्या पदावर आहात, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहात. आमची स्वप्नपूर्ती झाली. आमचे जीवन धन्य झाले. आजची पिढी बघता असे उपक्रम समाजात राबविल्या जावेत” हे ऐकत असताना साऱ्यांचे डोळे पाणावले. अविनाश खेवले, योगेश कापकर प्रकाश गजभिये, रवी इंदूरकर यांनी मनोगत व्यक्त करताना जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला. सुमारे 150 विद्यार्थी या उपक्रमात सहपरिवार सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर घाटुरकर, उदयसिंग गहिरवार, देवराव जवंजालकर ,रवी इंदूरकर अल्लादिन माखानी, मेघराज दहीकर, विजय सोरते व अविनाश खेवले यांनी अथक परिश्रम घेतले. व इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान दिले. हे एक टीमवर्क होते. सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि गुरुजनांच्या आयुष्याचा प्रवास डॉ. विजय सोरते यांनी उलगडून दाखविला. प्रास्ताविक अविनाश खेवले यांनी केले तर मनोगत व्यक्त करून रजनी धकाते हिने आभार मानले. राष्ट्रगीताने या सत्राची सांगता झाली.
या कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांचा परिचय मेळावा, आर्केस्ट्रा पार पडला. दुसऱ्या दिवशी शाळेला भेट देऊन जुन्या बाकावर बसण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. याही प्रसंगी विद्यार्थी भावविवश होत म्हणाले,” बीते हुए दिन कभी नही आयेंगे. यही एक गम है.”