श्रेयश वानखेडे:
कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या कागदी चहा कपांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी ब्रह्मपुरीतील सामाजिक कार्यकर्ते, ब्रम्हपुरी दर्पण चे संपादक राहुल श्रीराम भोयर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी याच विषयावर आदेश निर्गमित केल्यानंतर, चंद्रपूर जिल्ह्यातही तत्काळ पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कागदी चहा कपांच्या निर्मितीत वापरण्यात येणारे बिस्फेनॉल-ए (बीपीए) आणि मायक्रोप्लास्टिकचे घटक गरम द्रवांमुळे वितळून पोटात जातात. या घटकांमुळे कॅन्सर, हार्मोनल असंतुलन, प्रजनन समस्या यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. विशेषतः मुलांवर याचा दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असते. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना आदेश निर्गमित करून कागदी कपांवर बंदी घातली आहे.
राहुल भोयर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बुलढाणा जिल्ह्यातील आदेशाचा दाखला दिला. या आदेशात कागदी कपांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती आणि प्रतिबंधात्मक उपाय नमूद करण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही तत्काळ पावले उचलून कागदी कपांवर बंदी घालण्याचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा
राहुल भोयर यांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलल्यास जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील. “प्रशासनाने घेतलेल्या प्रभावी निर्णयामुळे भविष्यात आरोग्यासंबंधित गंभीर समस्या टाळता येतील आणि जनतेचा प्रशासनावरील विश्वास वाढेल,” असे त्यांनी नमूद केले.
सदर निवेदनाची दखल घेतल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक नागरिकांचा कॅन्सरसारख्या घातक आजारांपासून बचाव होईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.