आनंदी जीवनासाठी मनाची प्रसन्नता आवश्यक — डॉ. मंजुषा कुलकर्णी
केशवराज व्याख्यान मालेस प्रतिसाद.
Jyotsna Wankhede: आजच्या काळात माणसाचा फक्त मेंदू वाढला पण मनाचा हवा तसा विकास झाला नाही. मनाची प्रगती ही काळाची गरज असून आत्मिक प्रगती महत्त्वाची आहे. आनंदी जीवना साठी मनाची प्रसन्नता आवश्यक आहे. असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री,साहित्यिक तथा मुख्यमंत्री सचिवालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले. श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय आयोजित केशवराज व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प ‘ चला जगूया ऐसें जीवन ‘ या विषयावर प्रशालेच्या स्व.ॲड. वसंतराव खारकर सभागृहात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका, कवयित्री तथा प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय, मुंबई येथील डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी गुरुवार ( दि. १८ ) रोजी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध जोशी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेश खारकर हे होते. पुढे बोलताना डॉ. मंजुषा कुलकर्णी म्हणाल्या की, ” वाणी ही माणसाला एक तर सुखी करते किंवा दुःखी करते. म्हणून शब्द जपून वापरा. जो घरच्या स्त्रीचे कौतुक करतो तो सुखी होतो. जगण्याचा मार्ग आपल्या सकारा त्मक दृष्टीने आपण सोपा करू शकतो. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट करा. आनंदी जीवनासाठी मनातल्या, भावनांच्या गाठी सोडवने आवश्यक. ज्याचे मन सुंदर त्याचे जीवन सुंदर असते. कुटुंबाला वेळ द्यायला हवा. आनंद वाटता यायला हवा. तर जीवन सुखी होते. ” असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ मंजूषा कुलकर्णी यांनी स्वलिखित पुस्तके शाळेच्या ग्रंथालयास भेट दिली.अध्यक्षीय समारोप ऍड.अनिरुद्ध जोशी यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक संजय धारासुरकर,पाहुण्यांचा परिचय योगेश ढवारे,सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर तर आभार सर्जेराव सोळंके यांनी मानले.