बल्लारपूर तालुक्यात एन एम एस एस परीक्षेला अप्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती !
गैरप्रकार होण्याची दाट शक्यता!
Jyotsna Wankhede: श्री बालाजी हायस्कूल बामणी येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एन एम एस एस ) परीक्षा केंद्र दिले आहे व दि. २८ डिसेंबर रविवारला परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेला पर्यवेक्षक म्हणून अप्रशिक्षित कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती बल्लारपूर शालेय विभागाने केली आहे. तेच शिक्षक आप- आपल्या शाळेत सदर परीक्षेचे विषय शिकवतात अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. केंद्रांवर त्याच शाळेचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गैरप्रकार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे तालुक्यातील पालकांनी परीक्षे संदर्भात संदेह व्यक्त करत अशा शिक्षकांची नियुक्ती करू नये अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या दुर्बल होतकरू इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी सदर परीक्षा घेत असतात. यामध्ये त्यांच्या निकषानुसार पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती देतात ही परीक्षा स्पर्धा परीक्षेची पायरी म्हणून सुद्धा ओळखली जाते. अशा परीक्षेकडे बल्लारपूर तालुक्यातील शिक्षण विभाग गंभीरतेने न पाहता निव्वळ आपल्या मर्जीतील शाळेला झुकते माप देण्यासाठी एन एम एस एस परीक्षेचे विषय शिकवणाऱ्या कंत्राटी अप्रशिक्षित व तसेच आपल्या मर्जीतील शिक्षकांची निवड करून होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे. असा आरोप पालकांनी केला आहे. मागच्या वर्षी असेच शिक्षकांची नियुक्ती करून गैरव्यवहार करून विद्यार्थ्यांना पास करण्यात आले असा आरोप पालकांनी केला आहे. करिता सदर परीक्षेला विषय न शिकविणारे शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे. अन्यथा सदर परीक्षा प्रमुखा बाबतची तक्रार शिक्षण अधिकाऱ्याकडे करू असा इशारा पालकांनी दिला आहे.