म्हाडाची २००४ घरे पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
आ.मुनगंटीवार यांनी घेतली म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक
पारदर्शक लाभार्थी निवड आणि गरजू कुटुंबांना प्राधान्य देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा
*Jyostna Wankhede* : नवीन चंद्रपूर (म्हाडा) परिसरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेली २००४ घरे खऱ्या अर्थाने पात्र आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावीत, यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत आज म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय इंगोले आणि कार्यकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण झूम बैठक घेतली. या बैठकीत ज्यांच्या नावावर कुठेही स्वतःचे घर नाही, अशा पात्र नागरिकांना प्राधान्य देणे, लाभार्थी निवड प्रक्रिया पारदर्शक ठेवणे, तसेच नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, हा या बैठकीमागील प्रमुख उद्देश असून, पात्र लाभार्थ्यांपर्यंत या योजनेचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पासाठी सुरुवातीपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. नवीन चंद्रपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर घरकुल प्रकल्प उभारण्याची संकल्पना मांडत त्यांनी संबंधित विभागांकडून प्रस्ताव तयार करून घेतला आणि तो केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची प्रक्रिया गतीमान केली. यासाठी त्यांनी राज्यमंत्री पंकज भोयर, म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्र व राज्य शासनातील संबंधित यंत्रणांसोबत वेळोवेळी बैठका घेतल्या. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पहिल्या टप्प्यात २००४ घरांसाठी सुमारे २६२ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली. आता या घरांचे वाटप पारदर्शक व गतिमान पद्धतीने व्हावे, यासाठीही त्यांनी पुढाकार घेत ही बैठक आयोजित केली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ज्यांच्या नावावर कुठेही स्वतःचे घर नाही, अशा पात्र व गरजू नागरिकांना या घरांचा लाभ प्राधान्याने मिळावा, यावर विशेष भर दिला. तसेच पात्र लाभार्थ्यांची नोंदणी लवकरच सुरू करण्यात यावी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना घर खरेदीसाठी बँक कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेचा लाभ समाजातील खऱ्या अर्थाने गरजू आणि पात्र कुटुंबांपर्यंत पोहोचावा, यावर विशेष भर दिला. त्यानुसार बैठकीत ऑटोचालक, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी, कंत्राटी कामगार, महानगरपालिका सफाई कर्मचारी, माथाडी कामगार, खासगी नर्सिंग होममधील परिचारिका, रेल्वे अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन आवश्यक असलेली पात्र कुटुंबे तसेच चंद्रपूर नदीकाठावरील पावसाळ्यात पाणी शिरणाऱ्या कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना या योजनेत प्राधान्याने समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय शासनाने निश्चित केलेल्या निकषांमध्ये बसणाऱ्या इतर सर्व पात्र व गरजू घटकांनाही या योजनेचा लाभ मिळावा, यावरही आ.मुनगंटीवार यांनी भर दिला. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपये निश्चित करण्यात आली असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना घर खरेदीसाठी आवश्यक बँक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेचा लाभ एकाही पात्र व गरजू कुटुंबापासून वंचित राहू नये, यासाठी लाभार्थी निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुलभ आणि लोकाभिमुख पद्धतीने राबविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. पात्र नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक मार्गदर्शन, समन्वय आणि बँक कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला. तसेच म्हाडामार्फत लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नोंदणीसाठी सज्ज राहावे, असे आवाहनही आ.मुनगंटीवार यांनी केले.