*अखेर शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा!* शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला यश; कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक पदे भरण्यास शासनाची मान्यता*
*ज्योत्स्ना वानखेडे*: महाराष्ट्रातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, शासनाने यासंदर्भात दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सरकार्यवाह मा. शिवाजीराव खांडेकर यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. शासनासोबत केलेला पत्रव्यवहार तसेच विविध बैठकींतून त्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या ठामपणे मांडल्या.
दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रधान सचिवांसोबत झालेल्या बैठकीत शिक्षकेतर पदभरतीचा प्रश्न प्राधान्याने उपस्थित करण्यात आला. शिक्षक भरती प्रक्रिया ज्या पद्धतीने सुरू करण्यात आली आहे, त्याच धर्तीवर अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या शिक्षकेतर पदांची भरती तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रधान सचिवांनी शिवाजीराव खांडेकर यांना दिले होते.
या पाठपुराव्यानंतर शासनाने दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी शिक्षकेतर पदभरतीसंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करून भरती प्रक्रियेला अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शाळांमधील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील पदे नियमानुसार भरण्याचा मार्ग खुला झाला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय म्हणजे केवळ एका व्यक्तीचा किंवा एका संघटनेचा विजय नसून, महाराष्ट्रातील तमाम शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा, सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा आणि संघर्षाचा विजय असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सरकार्यवाह मा. शिवाजीराव खांडेकर सर यांचे महाराष्ट्रातील शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींच्या वतीने हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
“संघर्ष सुरू ठेवला तर यश निश्चित मिळते.
एकजूट जिंकली… शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लढा जिंकला!”
शिवाजीराव खांडेकर सर यांच्या या अविरत कार्याला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून मनःपूर्वक सलाम व्यक्त करण्यात येत आहे.