Friday, September 18, 2026
spot_img
HomeYojnaचंद्रपूर जिल्ह्यातील ६४० शेतकऱ्यांच्या हक्काचे १८.२६ कोटी रुपयांचे अनुदान मिळवून देण्यासाठी आ.सुधीर...

चंद्रपूर जिल्ह्यातील ६४० शेतकऱ्यांच्या हक्काचे १८.२६ कोटी रुपयांचे अनुदान मिळवून देण्यासाठी आ.सुधीर मुनगंटीवार यांचा ठाम पाठपुरावा!

चंद्रपूर जिल्ह्यातील ६४० शेतकऱ्यांच्या हक्काचे १८.२६ कोटी रुपयांचे अनुदान मिळवून देण्यासाठी आ.सुधीर मुनगंटीवार यांचा ठाम पाठपुरावा!

कृषी यांत्रिकीकरण योजनेतील ३०८ दिवसांपासून प्रलंबित अनुदानासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे कृषिमंत्र्यांकडे ठोस प्रयत्न

शेतकऱ्यांच्या अडचणींकडे संवेदनशीलतेने लक्ष; ट्रॅक्टर कार्यालयात उभे करण्याची वेळ येणे ही गंभीर बाब



*Jyotsna Wankhede*: जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरण (STATE & SMAM) योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व हार्वेस्टर खरेदी केलेल्या ६४० पात्र शेतकऱ्यांचे तब्बल १८ कोटी २६ लाख ३ हजार रुपयांचे अनुदान मागील ३०८ दिवसांपासून प्रलंबित असल्याची गंभीर बाब आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तात्रयजी भरणे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवून कर्ज काढून तसेच स्वतःच्या आर्थिक परिस्थितीतून निधी उभारून यंत्रसामग्री खरेदी केली आहे. मात्र, हक्काचे अनुदान वेळेत न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला असून, शेतकऱ्यांच्या या अडचणीची संवेदनशील दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी प्रलंबित अनुदान तातडीने खात्यावर जमा करण्याची आग्रही मागणी केली आहे.

कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ घेताना शेतकऱ्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. शासनाच्या योजनेतून अनुदान मिळणार असल्याच्या विश्वासावर त्यांनी ट्रॅक्टर व हार्वेस्टरची खरेदी केली. मात्र, तब्बल दहा महिन्यांहून अधिक काळ अनुदान प्रलंबित राहिल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर थेट कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात आणून उभे करण्याची भूमिका घेतली आहे. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी पत्रात स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता त्यांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेऊन तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे, अशी भूमिका आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. शेतकऱ्याने शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवून आपली जबाबदारी पूर्ण केल्यानंतर त्याच्या हक्काच्या अनुदानासाठी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.प्रलंबित अनुदानामुळे संबंधित शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत असून, कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या मूळ उद्देशालाच बाधा निर्माण होत आहे. उत्पादन खर्च कमी करणे, शेतीची कामे वेळेत पूर्ण करणे आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे हा या योजनेचा उद्देश आहे. मात्र, अनुदानाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक दिलासा मिळत नसल्याचे आ. मुनगंटीवार यांनी कृषी मंत्री यांना पत्र लिहत निदर्शनास आणून दिले.

त्यामुळे ६४० शेतकऱ्यांचे १८ कोटी २६ लाख ३ हजार रुपयांचे प्रलंबित अनुदान वितरित करण्यासाठी तातडीने आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन तो थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.तसेच अनुदान वितरणास विलंब होण्यामागील कारणांची तातडीने चौकशी करून संबंधित स्तरावर आवश्यक कार्यवाही करावी आणि भविष्यात STATE व SMAM योजनांचे अनुदान दीर्घकाळ प्रलंबित राहणार नाही, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणीही आ. मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे केली आहे.

शेतकरी हा शासनाच्या कृषी योजनांचा केंद्रबिंदू आहे. शासनावर विश्वास ठेवून यंत्रसामग्री खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला त्याचे हक्काचे अनुदान मिळण्यासाठी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागू नयेत, ही आ. सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका त्यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेची प्रचिती देणारी आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page