श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सवानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिभावात सांगता
Jyotsna Wankhede: श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त सेलू शहरातील विद्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य व दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, गाथा भजन व महाशिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची अत्यंत भक्तिमय वातावरणात सांगता शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली.शनिवार, दि. १७ जानेवारी२०२६ रोजी सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहात सातही दिवस सेलू व परिसरातील महिला-पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामस्मरणाचा लाभ घेतला. सप्ताहाची सांगता श्री हरिभक्त परायण गुरुवर्य विष्णुदास नामदेवजी महाराज चारठाणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली.या सप्ताहादरम्यान श्री हरिभक्त परायण उद्धवजी महाराज वाकणकर (नाथ्रेकर) यांच्या मधुर वाणीमधून सादर झालेल्या शिवमहापुराण कथेचा भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन आनंद घेतला. विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय ठरला.सात दिवस दररोज सकाळ व रात्री असे दोन कीर्तन सत्र ठेवण्यात आले होते. सकाळच्या सत्रातमुकुंद महाराज गात, आनंद महाराज पावडे (हदगावकर), भगवान महाराज गजमल डासाळकर, पुरुषोत्तम महाराज वालूरकर, जगन्नाथ महाराज मस्के, सारंगधर महाराज खाळगावकर व संतोष महाराज पवार यांनी कीर्तनातून अध्यात्मिक बोध दिला.तर रात्रीच्या सत्रात नंदकिशोर महाराज खरात (नेवासा), ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, अर्जुन महाराज लाड, अच्युत महाराज दस्तापुरकर, प्रकाश महाराज जवंजाळ व बापूसाहेब महाराज मोरे यांनी हरिकीर्तन सेवा सादर केली.कार्यक्रमाची दैनंदिन रूपरेषा अत्यंत शिस्तबद्ध होती –पहाटे ४ ते ६ काकडा भजन,६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण,९ ते ११ गाथा भजन, ११ वाजता कीर्तन,दुपारी २ ते ५ शिवमहापुराण कथा,५ ते ६ हरिपाठ,रात्री ८ ते १० हरिकीर्तन जागर असे सातत्याने नामस्मरण सुरू होते.हा सोहळा विद्यानगर मित्र मंडळाच्या वतीने, सेलू- जिंतूर तालुक्यातील जनतेच्या सहकार्याने आणि सद्गुरु जोग महाराज (आळंदी) यांच्या आशीर्वादाने पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत विष्णुदास नामदेवजी महाराज चाटणकर यांनी पुढाकार घेतला.संपूर्ण सप्ताहभर विद्यानगर परिसर “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषाने दुमदुमला होता. या भक्तिमय वातावरणामुळे सेलू नगरीत आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीची अखंड धारा अनुभवास आली.