श्रेयश वानखेडे:
संपूर्ण देशभरात 4 ते 11 फेब्रुवारी पर्यंत भारतीय जनता पार्टी तर्फे गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गाव व बुथ वर भाजपाचे प्रमुख पदाधिकारी 24 तास थांबणार असून या प्रवासी कार्यकर्त्यांकडून केंद्र व राज्यसरकारच्या योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहचवीत मतदारांशी संपर्क साधणार असल्याची माहिती या अभियानाचे जिल्हा संयोजक व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी बल्लारपूर येथील स्थानिक शासकीय विश्राम गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
2014 ते 2024 या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला. गरीब कल्याण, महिला सशक्तिकरण, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अश्या अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे. मोदी सरकार ला भाजपा शासित अनेक राज्य सरकारांनिही उत्तम साथ देत आपआपल्या राज्यात मोठा विकास केला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा यांनी देशभरात गाव चलो अभियान सुरु करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानात सात लाख खेड्यांमधील बुथवर भाजपाचे प्रशिक्षित प्रवासी कार्यकर्ते 24 तास थांबून बुथ वर पूर्णवेळ लक्ष केंद्रित करणार आहेत.बुथवरील प्रत्येक घरी मोदी सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती दिल्या जाणार आहे.
या अभियानाला चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी नुकतीच जिल्हास्तरीय व मंडल स्तरीय कार्यशाळा घेऊन प्रत्येक बुथ वर जाणाऱ्या प्रवासी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले गेले असल्याची माहिती यावेळी संजय गजपुरे यांनी दिली. या अभियाना अंतर्गत चंद्रपूर जिल्हा ग्रामीण च्या 1723 बुथ वर प्रवासी कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पदाधिकारी व आजी माजी लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे चंद्रपूर तालुक्यातील दाताळा येथे तर राष्ट्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजभैया अहिर हे चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथे प्रवासी कार्यकर्ता म्हणून मुक्काम करणार आहेत. त्याचप्रमाणे आम. बंटीभाऊ भांगडिया हे चिमूर तालुक्यातील मांगलगाव येथे,भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा हे बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे, माजी आम. प्रा. अतुलभाऊ देशकर हे ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान येथे, माजी आम. संजय धोटे हे राजुरा तालुक्यातील सोंडो येथे, माजी आम. सुदर्शन निमकर हे राजुरा तालुक्यातील कोहपरा येथे, जेष्ठ नेते चंदनभैया चंदेल हे बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे, माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे हे राजुरा तालुक्यातील देवाडा येथे, माजी जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले या मुल तालुक्यातील राजुली येथे या अभियाना अंतर्गत प्रवास करणार आहेत.
या पत्रपरिषदेला भाजपाचे जेष्ठ नेते चंदनभैया चंदेल, गाव चलो अभियानाचे जिल्हा संयोजक संजय गजपुरे, भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय पदाधिकारी श्रीमती. शिखाताई माथुर, महिला मोर्चा प्रदेश महामंत्री कु. अल्काताई आत्राम, भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, बल्लारपूर शहर अध्यक्ष काशी सिंह, भाजयुमो प्रदेश सचिव आशिष देवतळे, निलेश खरबडे,शिवचंद द्विवेदी,रेणुकाताई दुधे, मनीष पांडे, सौ. वंदनाताई शेंडे,सौ. निलमताई सुरमवार, सौ. विजयालक्ष्मी डोहे, शहर महिला अध्यक्ष वैशालीताई जोशी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. पत्र परिषदेचे संचलन भाजयुमो चे महामंत्री घनश्याम बुरडकर यांनी केले. उपस्थित पत्रकारांचे आभार शहर अध्यक्ष काशी सिंह यांनी मानले.