छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करावा
सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
पोंभूर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण
महाराजांचे 13 वे वंशज खासदार, श्रीमंत उदयनराजे भोसले यांची विशेष उपस्थिती


Shreyash Wankhede: गरिबांना न्याय मिळावा, रयतेचे राज्य निर्माण व्हावे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. स्वराज्य स्थापनेसाठी लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श आहेत. त्यामुळे येथे महाराजांच्या पुतळ्याची स्थापन होत असताना आपली जबाबदारी वाढली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही आणि होऊ देणार नाही असा संकल्पच या निमित्ताने आपण करायचा आहे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभूर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण सोमवारी झाले. त्यावेळी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे आयोजित या सोहळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे थेट वंशज तथा राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची विशेष उपस्थिती होती. तर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपा ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, सुहासराजे शिर्के येशुबाई फाऊंडेशन, जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरूनुले, महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम, नगराध्यक्ष पोंभुर्णा सुलभाताई पिपरे, अजित मंगळगिरीवार, ऋषी कोटरंगे, दर्शन गोरंटीवार,आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती.
या पुतळ्यासाठी स्वर्गीय गजानन गोरंटीवार अतिशय प्रयत्नशील होते, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ‘अनेक दिवसांपासून येथील नागरिकांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी होती. ती मागणी पूर्ण करण्याचे सौभाग्य मला लाभले आणि पुतळ्याच्या अनावरणासाठी थेट महाराजांचेच वंशज उदयनराजे भोसले पोंभुर्णा येथे आले. त्यामुळे पोंभुर्णा वासियांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. उदयनराजे भोसले नेहमी साताऱ्यातच शिवजयंती साजरी करतात. या दिवशी ते इतर ठिकाणी जात नाहीत. मात्र पुतळ्याच्या अनावरण्यासाठी ते पोंभुर्णा येथे आले आहेत. त्यांच्या रूपाने शिवाजी महाराजांचा आशीर्वादच आपल्याला मिळाला आहे,’ असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
12 मे 1666 रोजी आग्रा येथील ज्या लाल किल्ल्यामध्ये औरंगजेबाने छत्रपतींना शेवटच्या रांगेत उभे केले होते, तेव्हा छत्रपतींनी वाघाची डरकाळी फोडली. त्याच दरबारात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. उदयनराजे हे सुद्धा तेथे उपस्थित राहतील, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. शिवकालीन दांडपट्टा राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सिंदखेडराजाचा उत्कृष्ट असा विकास आराखडा तयार होत असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. छत्रपती शिवरायांचे 12 गड किल्ले आणि मराठा लष्कर स्थापत्य याचा प्रस्ताव युनेस्कोमध्ये पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
‘हे तर माझे भाग्य’
अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविण्याचे सौभाग्य आपल्याला लाभल्याचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ‘भारत-पाक सीमेवर कुपवाडा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला. वाघनखं भारतात आणण्यासाठी लंडनसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून पुढील काही महिन्यातच वाघनखे येतील. शिवाजी महाराज हे सर्वांसाठी आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला, मात्र येथील मावळ्यांनी औरंगजेबाला याच भूमीत दफन केले. औरंगजेबाने संभाजी महाराजांवर 40 दिवस अतोनात अत्याचार केले. त्यांचे केस काढले, नखं काढली, डोळे फोडले. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर 2023 ला औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर ठेवण्याचे भाग्य ही मला लाभले,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आपण सारेच महाराजांचे वारस – श्रीमंत उदयनराजे भोसले
‘पोंभुर्णा येथे येण्याचा मनापासून आनंद आहे. सुधीरभाऊ आमचे थोरले बंधू असून केवळ मी एकटाच छत्रपतींचा नाही तर आपण सर्वजण छत्रपतींच्या विचारांचे वारसदार आहोत,’ असे खासदार श्री. उदयनराजे भोसले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे अन्याय दूर करण्यासाठी लढले तर इतर राजांनी केवळ आपले साम्राज्य वाढविण्यासाठी लढा दिला. आज संपूर्ण देशात छत्रपतींची प्रतिमा देवघरात ठेवली जाते. राज्य चालविण्यात लोकांचा सहभाग असावा, रयतेचे राज्य असेच छत्रपती नेहमी म्हणायचे. लोकशाहीचा मूळ गाभाच त्या काळात शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभारातून दाखवून दिला, असेही ते म्हणाले.
सुधीरभाऊंच्या प्रयत्नांतून आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. शिवाजी महाराज हे जनतेचा विचार करायचे. आज लोक व्यक्ती केंद्रित झाल्याचे पाहायला मिळते. देशाची अस्मिता, अखंडता कायम ठेवायची असेल तर फक्त आणि फक्त छत्रपतींचा विचारच एकसंघ ठेवू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली सर्वधर्मसमभावाची भावना आपण आचरणात आणली पाहिजे. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी केवळ घोषणाच केल्या नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारही आचरणात आणले. त्यामुळेच केंद्र आणि राज्यात विकासाचे पर्व बघायला मिळत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माचे लोक जोडले संपूर्ण समाज त्यांचे कुटुंब होते. पोंभुर्णा येथे महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना अतिशय आनंद होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनात ठेवून भावी पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवावे, असे आवाहन श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी केले.






