नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा द्या अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्र शेतकरी ब्रिगेड यांनी केला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना (एक रुपयांमध्ये पिक विमा) अंतर्गत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाचा पिक विमा सरकारने सांगितलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स या सरकारी कंपनीकडे काढलेला होता. आता अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानग्रस्त पिकाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेळेच्या आत केली होती. जेव्हा पिक विमा मिळण्यास सुरुवात झाली तेव्हा असे आढळून आले की एकाच गावातील काहीच लोकांना पिक विमा त्यांच्या खात्यावर जमा झाला तर बहुसंख्य लोकांचा पिक विमा नोंदणी करून सुद्धा जमा झालेला नव्हता,त्यामुळे मुल तालुक्यातील हळदी या गावातील शेतकऱ्यांनी डॉ. राकेश गावतुरे यांच्या मार्गदर्शनामध्ये पिक विमा च्या समस्येला घेऊन उपसंचालक,कृषी विभाग चंद्रपूर येथे विचारपूस केली असता पिक विमा देणारी कंपनी ही ओरिएंटल इन्शुरन्स आहे पण वास्तविक नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभाग किंवा ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीद्वारे न करता दुसऱ्याच कुठल्यातरी झेनित सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी करीत आहे आणि या कंपनीच्या कर्मचाऱ्याला आमचे पिक विमा का बर खात्यात जमा झाले नाही अशी विचारपूस केली असता तुम्ही पिक विम्यासाठी अपात्र झाले असे सांगण्यात आले. यावर कारण विचारले तर सांगण्यात आले की तुम्ही वेळेच्या पूर्वी नुकसानग्रस्त पिकाची नोंदणी केली नाही पण शेतकऱ्यांनी उपसंचालक कृषी विभाग यांच्या समक्ष पुराव्यानुसार सांगितले की आम्ही दिले गेलेल्या वेळेच्या पूर्वीच नोंदणी केलेली आहे.
काही शेतकरी झेनित सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले असता हे ऑफिस ला कुलूप लावून आहे असे आढळून आले.त्यामुळे कोणत्या अटी वर शेतकऱ्यांना पात्र/अपात्र ठरविले,विम्याची रक्कम कशी ठरविली,यासाठी जबाबदार व्यक्ती कोण याबद्दल काहीही तारतम्य नाही त्यामुळे हा सर्व सावळा गोंधळ आहे आणि येथे फार मोठा घोटाळा असल्याची शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली . त्यामुळे डॉ. राकेश गावतुरे यांनी कृषी विभागास या सर्व प्रकरणाची चौकशी करून नोंदणीकृत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा करावां ही समज दिली अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन उग्र आंदोलन करू असा इशारा दिला.
या वेळी डॉ. समीर कदम, विजय मुसळे, श्रीकांत हस्ते, प्रमोद चलाख, हेमंत भुरसे, भाविक कारडे, महेश चीचघरे, जितेंद्र कोठारे, दिनेश चलाख,मनोज बुरांडे,राजू शेंडे, नामदेव पिंपळे आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.