Sunday, September 13, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपूरचे नाव देशात मोठे करा, आई-वडिलांना विसरू नका!

बल्लारपूरचे नाव देशात मोठे करा, आई-वडिलांना विसरू नका!

बल्लारपूरचे नाव देशात मोठे करा, आई-वडिलांना विसरू नका!

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
बल्लारपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थिती


Shreyash Wankhede: विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यात त्यांचा स्वतःचा फायदा आहेच, पण बल्लारपूरचाही मोठा फायदा आहे. आपल्या भागातील एखादा विद्यार्थी किंवा एखाद्या विद्यार्थीनीचे राज्यभर, देशभर कौतुक होते, तेव्हा बल्लारपूरचे आणि येथील लोकांचेही कौतुक होत असते. माझ्या बल्लारपुरातील विद्यार्थ्यांनी देशात नावलौकीक प्राप्त करावा. त्याचवेळी ज्या आई-वडिलांनी संघर्षातून आपल्याला मोठं केलं, त्यांचाही विसर पडू देऊ नका, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

बल्लारपूर येथे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते चंदनसिगं चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजपच्या महामंत्री संध्याताई गुरनुले, भाजपचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, रणंजय सिंग, निलेश खरबडे, वैशाली जोशी, नम्रता आचार्य, रेणुका दुधे, देवा वाटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ते म्हणाले, ‘स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी नाही तर माझ्या गावासाठी, जिल्हा आणि देशासाठी मी मेहनत करेन, हा भाव ठेवून भविष्य घडविणे महत्त्वाचे आहे. शिक्षणाचे महत्त्व खूप आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षणाच्या संधी वाढाव्यात यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असतो. चंद्रपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, बल्लारपूर येथे S.N.D.T. विद्यापीठाचे केंद्र मंजूर केले. सोमनाथ (मुल) येथे भव्य कृषी महाविद्यालय उभारले जात आहे.आता मुल येथे शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजसाठी मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तसेच बल्लारपूर येथे सुषमा स्वराज स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन लवकरच होणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय आणि डॉ. बाबा आमटे अभ्यासिका उपयुक्त ठरत आहेत. यामागे आपल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी आणि जिल्ह्याचे नाव देशभरात गौरवाने घेतले जावे, याच उद्देशाने हे सर्व प्रयत्न सुरू आहेत.’

एसएनडिटीमध्ये ६२ अभ्यासक्रम सुरू होतील, तेव्हा या जिल्ह्यातील माझ्या बहिणींच्या कौशल्यांसाठी आकाश मोकळे होणार आहे. स्व. सुषमा स्वराज स्किल सेंटरच्या माध्यमातून आणखी एक दालन मोकळे करून दिले आहे. शिक्षणावर फक्त श्रीमंताचा अधिकार असू नये. उलट ज्यांच्या मनामध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्ज्वलित करण्याची गरज आहे, त्या परिवारांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, हा उद्देश आहे असेही ते म्हणाले.

“शिक्षण हे स्वैराचारी असता कामा नये, ते संस्कारी असले पाहिजे”. खूप शिकल्यावरही आई-वडिलांचा परिचय करून देताना लाज वाटत असेल तर काहीच उपयोग नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘माणूस द्या मज माणूस द्या’. शिक्षणाचा अर्थ माणुसकी जोपासणारा नसेल, तर त्या शिक्षणाचा फक्त धनप्राप्तीसाठी उपयोग होईल. आत्मविश्वास जागवावा लागेल. त्यातूनच पुढचा मार्ग सुकर होणार आहे. पैसा महत्त्वाचा आहे, पण सर्वस्व नाही. मन निराश न ठेवता जगातील उत्तमोत्तम ज्ञान कसे आत्मसात करता येईल, याचा सातत्याने विचार करा. कोणत्याही युगात शिक्षणाचे महत्त्व कायमच राहिले आहेत. म्हणूनच घरावरील नेमप्लेटवर नावाखाली शिक्षणचाच उल्लेख असतो. आपल्या संपत्तीचा नसतो. शिक्षण हे धनापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. शिक्षण हा सर्वाधिक मिरवण्याचा अलंकार आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

आत्मविश्वासासोबत संधीकडेही बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर संधी सोडायची नाही. कोणत्या दिशेने जावे, असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. त्यासाठी आपल्यातील क्षमता, गुण, दोष कागदावर लिहून काढले पाहिजे. जगात परिपूर्ण कुणीच नाही. प्रत्येकात काहीतरी दोष आहेत. १४७ गुणदोष आहेत, असं स्व. श्रीकांत जिचकार म्हणायचे. प्रत्येकात एवढे गुणदोष असणे शक्यच नाही. त्यामुळे लिहून काढा, त्याचा करियर निवडताना फायदा होईल. स्वतःसाठी जगणे हा शिक्षणाचा अर्थ नाही. शिक्षण घेताना आई-वडिलांची सेवा करायचीच आहे. पण भारतमातेचाही विचार करा. देशासाठी मोठे व्हायचे आहे, हा विचार करा. ज्या देशाने मला सर्व दिलं, त्या देशासाठी मी देखील काहीतरी करू शकतो, असाही भाव मनात ठेवण्याचा सल्ला आ. श्री. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

प्रत्येक कामात परफेक्शन ठेवा


जपानमध्ये एखाद्या उत्पादनाची गुणवत्ता एका टक्क्याने देखील कमी असेल तर ते उत्पादन रद्द केले जाते. शंभर टक्के उत्तम गुणवत्ता तिथे अनिवार्य आहे. त्यामुळेच जापान जगात सर्वात पुढे आहेत. एवढे परफेक्शन आपल्या कामामध्ये असले पाहिजे. एखादे बीज लावताना ते छोटेसे रोपटे असते. पण ते मोठे झाल्यावर तुम्ही तोडू शकत नाही. त्यामुळे भविष्यातील इच्छेचे बिजारोपण करा, रोज परिश्रमाचे पाणी टाका. तुमच्या मनातील इच्छेचा वृक्ष एवढा मोठा होईल, की तुमच्या ज्ञानाचा प्रकाश समाजालाही मिळेल, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

‘योग, ध्यान करा; रोज डायरी लिहा’

मोठे होण्यासाठी छोटी छोटी कामे करा. योग करा, ध्यान करा. सात तास झोप घ्या. जरा विश्रांती घेऊन एखादं सुंदर गाणं ऐकलं पाहिजे. एकावेळी एकच काम करायचे. मेंदूला ताजेतवाने ठेवायचे असेल तर रोज डायरी लिहा. एक पान रोज प्रत्येकाने लिहायचेच आहे. मनात येईल, तो विचार लिहून ठेवा. त्यातून सकारात्मकता निर्माण होते. मोठे होण्यासाठी आई-वडिलांच्या सेवा करा, त्यांचा आदर करा.

‘तर बल्बचा शोध लागलाच नसता’

१८५० ते ५५ चा काळ होता. शाळेतून मिळालेले पत्र मुलाने आईला दिले. आई पत्र वाचताना रडायला लागली. थॉमस अल्वा एडिसनने विचारले, या पत्रात असं काय आहे. आई म्हणाली, तुझ्या शिक्षिकेने लिहिले आहे की, ‘तुमचा मुलगा एवढा हुशार आहे की, इतर मुलांसोबत शिकवताना अडचण जात आहे. तुम्ही याला घरीच शिकवा.’ आईने घरीच शिकवायला सुरुवात केली. त्याला रसायनशास्त्रात खूप रस होता. पण संघर्ष कमी नव्हता. भाजी विकली, पेपर टाकले. त्याचा एक कानही निकामी झाला. मात्र जिद्द सोडली नाही. आज एडिसनच्या नावावर एक हजार पेटंट आहेत. बल्बचा शोधही त्यानेच लावला. खूप मोठा झाल्यावर एक दिवस त्याला ते जुने पत्र सापडले. त्यात लिहिले होते, ‘तुमचा मुलगा वर्गातील सर्वांत ढ विद्यार्थी आहे. त्याला शिकवताना अडचणी येतात. इतर विद्यार्थी बिघडण्याची शक्यता आहे.’ त्याच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते, ही कथा सांगून आ. श्री. मुनगंटीवार यांनी ‘कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती’ ही कविता विद्यार्थ्यांपुढे वाचली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page