सराईत गुन्हेगारास एक वर्षाकरिता स्थानबद्ध : रामनगर पोलिसांची कारवाई
Jyotsna Wankhede:रामनगर पोलिसांनी चंद्रपूर शहरातील सराईत गुन्हेगार महेंद्र आनंदराव ढुमणे (वय ४३) रा. गजानन मंदिराजवळ, बापटनगर, चंद्रपूर यास एक वर्षाकरिता स्थानबद्ध (तडीपार) केले आहे. सदर कारवाई महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टीवाले, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे (व्हिडिओ पायरट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध करण्यात येणाऱ्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम, १९८१ (सुधारणा २००९ व २०१५) (एम.पी.डी.ए.) अंतर्गत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र ढुमणे हा गेल्या काही वर्षांपासून शहरात दहशत निर्माण करून सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करीत होता. त्याच्यावर रामनगर तसेच इतर पोलीस ठाण्यांत अवैध दारू विक्री, खुनाचा प्रयत्न, गैरकायदेशीर जमाव करून दंगा, गंभीर दुखापत, शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी तसेच अवैध अग्निशस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे नोंद आहेत.
यापूर्वीही त्याच्याविरुद्ध कलम ५६ मपोका अंतर्गत तडीपार आदेश तसेच कलम ११० (ई)(ग) जाफौ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याने त्या काळातही गुन्हेगारी प्रवृत्ती कायम ठेवली असल्याने बॉंड रद्द करण्यात आले होते.
सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करण्यात आला होता. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी यांनी एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले असून, आरोपीस दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे. पुढील काळात त्यास छत्रपती संभाजीनगर कारागृहात हलविण्यात येणार आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले तसेच रामनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसीफराजा बी. शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या सपोनि योगेश खरसान प्रभारी अधिकारी कोठारी पोलीस स्टेशन, पोउनि सुरेंद्र उपरे, पोहवा संजु देशवाले, अरुण खारकर, पोअं. परवेज शेख, अनिल जमकातन, राजू चिताडे, मपोहवा मनीषा मोरे, मपोशि ब्ल्युटी साखरे तसेच रामनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला.
रामनगर पोलिसांची ही कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रणासाठी केलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.