बल्लारपूरातील रस्ता अतिक्रमणाविरोधात अन्नत्याग आंदोलन, राहुल गायकवाड यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा
ज्योत्स्ना वानखेडे:
बल्लारपूर शहरातील वाढत्या रस्ता अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि विविध प्रशासकीय प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक पत्रकार राहुल गायकवाड यांनी मंगळवार १७ मार्चपासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.जि. के.उपरे यांनी राहुल गायकवाड यांचे स्वागत करीत आंदोलनस्थळावर पाठीबा दर्शविला.त्यांच्या या आंदोलनाला शहरातील शिवसेना(उबाठा) नगरसेवक सिक्की यादव,भाजपा नेते काशिनाथ सिंग,नगरसेवक इस्माईल ढाकवाला,निलेश खरबडे,विक्रांत पंडित,रमेश निषाद,नम्रता साव,प्रशांत वैरागडे,प्रशांत झामरे, प्रकाश दोतपेल्ली,ज्ञानेद्र आर्य,श्रीनिवास कुंडकुरी यांचेसह विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर त्वरित अतिक्रमण हटवण्याची प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात येत आहे.तसेच, शहरातील मंगल कार्यालये, लॉन्स आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये पुरेशी वाहनतळ व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यांवरच वाहनांची पार्किंग केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढते. यावर तोडगा निघेपर्यंत संबंधित आस्थापने बंद ठेवावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, शहरातील काही खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करत त्यांची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बल्लारपूर-चंद्रपूर रोडवरील विसापूर फाटा परिसरातील ६९ बट्टे जमीन भूमिहीनांना देण्यात आल्याच्या प्रकरणाचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
पत्रकारांविरुद्ध दाखल होणाऱ्या तक्रारींबाबतही आंदोलनातून मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. कोणत्याही पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वी सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच, सुरजागड परिसरातून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
राहुल गायकवाड यांच्या या अन्नत्याग आंदोलनामुळे शहरातील विविध प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आंदोलनाचा वाढता पाठिंबा लक्षात घेता प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.