मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पीक विमा हप्त्याचा फेरविचार करण्याची मागणी
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा दरांचा फेरविचार व्हावा ; आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
शेजारील जिल्ह्यांप्रमाणे वाजवी दर लागू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आमदार मुनगंटीवार यांचा आग्रह
मा.देवेंद्रजी फडणवीस खरीप हंगाम पिक विमा 2026 मा. दत्तात्रयजी भरणे खरीप हंगाम पिक विमा 2026
*Jyotsna Wankhede* : खरीप हंगाम २०२६ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भात, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर निश्चित करण्यात आलेला पीक विमा हप्ता शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. ही बाब अत्यंत संवेदनशीलतेने लक्षात घेत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रयजी भरणे यांना सविस्तर निवेदन पाठवून चंद्रपूर जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पीक विमा दरातील विसंगती दूर करून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आ. मुनगंटीवार यांनी निवेदनात नमूद केले आहे की, शासनाने ३ जुलै २०२६ रोजी जाहीर केलेल्या दरांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील भात, सोयाबीन आणि कापूस पिकांसाठी निश्चित करण्यात आलेला विमा हप्ता गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्धा या शेजारील जिल्ह्यांच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक आहे. भौगोलिक परिस्थिती, हवामान, पर्जन्यमान, मृदेचा प्रकार, पीकपद्धती आणि नैसर्गिक आपत्तींचा धोका जवळपास समान असतानाही केवळ चंद्रपूर जिल्ह्यावर एवढा जादा आर्थिक भार टाकणे न्याय्य ठरत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीडनाशके, मजुरी, मशागत आणि सिंचन यावर मोठा खर्च केला आहे. त्यातच वाढीव पीक विमा हप्ता भरावा लागत असल्याने अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. परिणामी, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, कीड किंवा रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळणार नाही, अशी चिंता आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पीक विमा हप्त्याचा तातडीने फेरविचार करून तो शेजारील जिल्ह्यांप्रमाणे वाजवी व न्याय्य स्तरावर आणावा, राज्य शासन, कृषी विभाग आणि संबंधित विमा कंपनीची तातडीने बैठक घेऊन ही विसंगती दूर करावी, तसेच सुधारित दर निश्चित होईपर्यंत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत वाढवावी, जेणेकरून कोणताही शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला न्याय्य पीक विमा दर मिळावेत
जिल्हानिहाय प्रति हेक्टर पीक विमा भात पिकासाठी गडचिरोलीमध्ये ₹५१२, गोंदियात ₹६०, भंडाऱ्यात ₹५७५ आणि नागपुरात ₹६५ इतका असताना चंद्रपूरमध्ये तो तब्बल ₹१,३०० निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कापूस पिकासाठी गडचिरोलीत ₹५९०, नागपुरात ₹६५ आणि वर्ध्यात ₹६५ इतका हिस्सा असताना चंद्रपूरमध्ये ₹१,३०० आकारण्यात आला आहे. तसेच सोयाबीन पिकासाठी वर्ध्या येथे ₹६५ इतका पीक विमा असताना चंद्रपूरमध्ये ₹१,२५० निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पीक विमा दराबाबत तातडीने फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.









