Tuesday, September 1, 2026
spot_img
HomeChandrapurमहामाया इन्फ्रा कंपनी तातडीने सुरू करा; ७०० कामगारांच्या रोजगारासाठी आमदार किशोर जोरगेवार...

महामाया इन्फ्रा कंपनी तातडीने सुरू करा; ७०० कामगारांच्या रोजगारासाठी आमदार किशोर जोरगेवार यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

महामाया इन्फ्रा कंपनी तातडीने सुरू करा; ७०० कामगारांच्या रोजगारासाठी आमदार किशोर जोरगेवार यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

कंपनी बंद करण्यामागील कारणांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचीही केली मागणी

*Jyotsna Wankhede* : चंद्रपूर तालुक्यातील बेलसणी येथील महामाया इन्फ्रा प्रा. लि. कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामकाज बंद केल्याने सुमारे ७०० कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा .अशोक उईके यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले. कंपनी तातडीने सुरू करण्यासह संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ३० जून २०२६ रोजी कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वकल्पना किंवा सूचना न देता कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सुमारे ७०० कामगारांचा रोजगार एकाच दिवसात हिरावला गेला असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च तसेच दैनंदिन उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील इतर कोळसा धुलाई (कोल वॉशरी) प्रकल्प सुरळीत सुरू असताना केवळ महामाया इन्फ्रा कंपनीचेच कामकाज बंद करण्यात आल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय नेमका कोणत्या कारणामुळे घेण्यात आला, याची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर महामाया इन्फ्रा कंपनीचे कामकाज तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावे, कामावरून कमी करण्यात आलेल्या सर्व कामगारांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, कंपनी अचानक बंद करण्यामागील कारणांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी तसेच कामगारांचा रोजगार सुरक्षित करून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अबाधित राहील, यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडे केली.

महामाया इन्फ्रा कंपनी बंद झाल्यामुळे निर्माण झालेला हा प्रश्न केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून शेकडो कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याशी निगडित आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम भूमिका आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी मांडली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page