सच्चिदानंद डाखोरे यांच्या स्वरात रायपूरवासियांनी घेतला संत सुरांचा आनंद.
ज्योत्स्ना वानखेडे: दि.28 सेलू तालुक्यातील रायपूर येथे गावकर्यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘जागर प्रबोधनाचा’ व्याख्यान माले अंतर्गत शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी आमलकी एकादशी व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ‘संतवाणी’ या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील संतांनी रचलेल्या अजरामर अभंगांचे सुमधुर गायन नूतन विद्यालयातील संगीत शिक्षक सुप्रसिद्ध गायक सच्चिदानंद डाखोरे यांनी सादर केले. त्यांच्या ओजस्वी व भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थित रायपूरकर भारावून गेले. ‘अवघा रंग एक झाला’ सह विविध अभंगांच्या गायनातून भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली. यावेळी त्यांनी संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत एकनाथ, संत मीराबाई, संत कबीर आदी संतांच्या भक्ती, बंधुता आणि अध्यात्माचे महत्त्व सांगणार्या रचनांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. अभंग गायनाला पखवाज वादक संतोष महाराज शिंदे यांनी समर्पक साथ दिली. बालगायक स्वानंद डाखोरे यांनी सादर केलेल्या भक्तिगीताने श्रोत्यांची मने जिंकली. संतवाणीचे निवेदन माधव गव्हाणे सर यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून बापूराव गाडेकर, तुकाराम मगर, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, पद्माकर गोंडगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण गाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन दादासाहेब गाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पांडुरंग गाडेकर, बाबासाहेब गाडेकर, पांडुरंग सोळंके, अंकुश गाडेकर, धोंडीराम गाडेकर, पार्थ गाडेकर, वेदांत गाडेकर, रामेश्वर गाडेकर, जिजाभाऊ हिंगे, जलील शेख, रवी महाराज, शिवाजी गाडेकर, नामदेव दिवटे आदींनी सहकार्य केले.