शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कापूस-सोयाबीन जळून खाक, बैल जोडी मृत्यूमुखी.
सेलू तालुक्यातील धनेगाव येथील घटना.

ज्योत्स्ना वानखेडे: दि.02 सेलू तालुक्यातील धनेगाव येथे गुरुवारी (दि. 1) रात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत शेतआखाड्यावर बांधलेली बैलजोडी आगीत होरपळून मृत्युमुखी पडली असून, शेतकर्याचे कापूस व सोयाबीन पिकासह मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर संकट ओढावले आहे. धनेगाव शिवारातील गट क्रमांक 141 मधील शेतकरी रामभाऊ देविदासराव कटारे यांच्या शेत आखाड्यावर गुरुवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे स्वरूप अत्यंत भीषण असल्याने आखाड्यावर बांधलेली एक बैलजोडी आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. या आगीत पशुधनासह शेतकर्याचे कापूस व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अंदाजे 20 क्विंटल कापूस आणि 12 क्विंटल सोयाबीन पूर्णतः जळून खाक झाले. वर्षभराची मेहनत आणि उदरनिर्वाहाचे साधन डोळ्या देखत जळताना पाहून परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकरी रामभाऊ कटारे यांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थां कडून करण्यात येत आहे.