सेलू तालुक्यातील राजा ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगाच्या तब्बल नऊ लाख 75 हजार रुपयांच्या निधीच्या कथित गैरकारभारामुळे तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गावाच्या विकास कामासाठी आलेल्या या निधीवरच डल्ला मारला गेला का? असा थेट सवाल राजा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित केला आहे. काही जागृत सदस्यांना या बाबत माहिती मिळाली असता त्यांच्या तक्रारीनुसार खोटे ठराव तयार करून परभणी येथील आय सी आय सी आय बँक गांधी पार्क येथील शाखेतील खात्यातून ही रक्कम काढण्यात आल्याचा आरोप आहे. राजा गावाचे ग्रामसेवक भाऊराव गुंजकर आणि सरपंच पदाचा कार्यभार पाहणारे सदस्य भागवत दळवे यांनी संगणमताने निधी उचलल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. गावाच्या विकासाच्या नावाखाली निधी, पण काम कुठं? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. जर ठरावच खोटे असेल तर तो मंजूर कसा झाला?आणि रक्कम काढताना प्रशासन झोपेत होते का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू असून ग्रामपंचायत कारभारावरच संशयाची छाया पडली आहे. सदर निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती सेलू तसेच जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. दोषीवर तात्काळ गुन्हा दाखल करून निःपक्षपणे चौकशी करावी अन्यथा आमरण उपोषण छेडण्याचा इशाराही काही सदस्यांनी दिला आहे. या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य सखुबाई गिनगिने, दिगंबर शेवाळे आणि पल्लवी शेवाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, चौकशीसाठी प्रशासनाला कधी मुहूर्त सापडणार? असा उपरोधिक सवाल आता तालुका भर चर्चेत आहे. राजा येथील प्रकरणामुळे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मधील वित्त आयोगाच्या निधीचा कारभारा बाबत ही संशय निर्माण झाला असून तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगाच्या वतीने दिलेल्या निधीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामाची सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. आता प्रश्न एकच विकासाचा पैसा खरंच विकासासाठी खर्च झाला की, कागदोपत्री विकास दाखवला गेला? हे सत्य बाहेर येईपर्यंत ग्रामस्थांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील पावलाकडे लागले आहे.