ज्योत्स्ना वानखेडे:
नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णव जी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले. या निवेदनात प्रामुख्याने कोव्हिड काळापासून बंद झालेली ‘सेवाग्राम एक्सप्रेस’ पुन्हा सुरू करण्याची आग्रही मागणी केली, तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पुणे येथे जातात, त्यांची ही गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र ‘चंद्रपूर-पुणे रेल्वे’ सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. यासोबतच ‘कोलकाता-बल्लारपूर’ ही नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी केली.
प्रवाशांच्या सोयीसाठी राजधानी एक्सप्रेसला चंद्रपूर स्थानकावर आणि दुरंतो एक्सप्रेसला वर्धा येथे तातडीने थांबा देण्यासह विविध लांब पल्ल्याच्या गाड्यांना चांदा फोर्ट स्थानकावर थांबा देण्याची विनंती केली. तसेच रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेच्या कामात जमिनी गमावलेल्या अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला व पुनर्वसन मिळवून देण्यासाठी मंत्र्यांचे विशेष लक्ष वेधले. रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णव जी यांनी या सर्व जनहितार्थ मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.