योगामुळे निरोगी, सकारात्मक आणि संतुलित जीवन जगणे शक्य – आ. किशोर जोरगेवार
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आझाद गार्डन येथे भारतीय जनता पार्टी व पतंजली योगपीठतर्फे योग शिबिर
*Jyotsna Wankhede*
योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र जोडणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुदृढ राहून जीवनात सकारात्मकता, निरोगीपणा आणि संतुलन निर्माण होते, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढाकाराने भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर आणि पतंजली योगपीठ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आझाद गार्डन येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरनुले, तुषार सोम, शशिकांत मस्के, विजय चंदावार, स्मिता रेभनकर, नसरीन शेख, शितल गुरनुले, विमलताई कातकर, ज्योती जीवने, सुमित बेले, स्वप्निल डुकरे, राकेश नाकाडे, नीलिमा वनकर, प्रकाश गुंटेवार, संजय उराडे, संजय निंबाळकर, कमल सिंह कछवाह, नंदकिशोर बांबाळे, नरेंद्र निंबाळकर, पुरुषोत्तम कडवे, रंजीत महाजन आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, भारताने जगाला दिलेल्या अनेक अमूल्य देणग्यांपैकी योग ही एक महान देणगी आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या योगाचा आज जगभर स्वीकार करण्यात आला असून, संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केल्यामुळे योगाचे महत्त्व जागतिक स्तरावर अधिक पोहोचले आहे. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचेही ते म्हणाले.
आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि मानसिक अस्थिरता यांसारख्या समस्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत योग हा निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचाही उल्लेख केला. देशहित आणि जनहिताचे अनेक ऐतिहासिक व दूरदृष्टीचे निर्णय गेल्या १२ वर्षांत घेण्यात आले असून, विकास, सुरक्षा, पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने देशाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळे आज भारत जगासमोर अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि ताठ मानेने उभा असल्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
निरोगी नागरिक हीच राष्ट्राची खरी ताकद असल्याचे सांगत आमदार जोरगेवार यांनी उपस्थितांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. योगामुळे केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाही, तर मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणीही विकसित होते, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी सामूहिक योगाभ्यास करून निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.