*बल्लारपूर शहर व तालुक्यात अवैध दारूचा सुळसुळाट; संबंधित विभाग ‘झोपेत’ ? कारवाईच्या निष्क्रियतेवर संताप*
*ज्योत्स्ना वानखेडे*
बल्लारपूर शहर व तालुक्यात अवैध देशी-विदेशी दारू विक्रीने अक्षरश: ऊत आला असून, या बेकायदेशीर धंद्याला आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध दारूची खुले आम विक्री सुरू असल्याचा आरोप होत असतानाही प्रभावी धाडी किंवा सातत्यपूर्ण कारवाई दिसून येत नसल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवर टीकेची झोड उठली आहे.
अवैध मद्यनिर्मिती, साठा, वाहतूक आणि विक्री रोखणे, हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करणे, बेकायदेशीर मद्य जप्त करणे, परवान्या शिवाय सुरू असलेल्या विक्री केंद्रांवर धाडी टाकणे तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 अंतर्गत गुन्हे दाखल करणे ही संबंधित विभागाची मूलभूत जबाबदारी आहे.
मात्र प्रत्यक्षात जबाबदाऱ्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, अवैध दारूविरोधातील कारवाईत संबंधित प्रशासन सातत्याने मौन धारण करीत असल्याचे चित्र दिसत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवैध दारूविरोधातील कारवाईची जबाबदारी नेमकी कोण पार पाडत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
बल्लारपूर शहर व तालुक्यातील अवैध दारू विक्रीचे वाढते जाळे मोडून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तक्रारींवर तातडीने कारवाई करणारी यंत्रणा उभी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शासन या गंभीर आरोपांची चौकशी करून ठोस पावले उचलते की हा विषयही कागदावरच राहतो, याकडे लक्ष लागले आहे.