गावकऱ्याच्या हक्काच्या घरासाठी सरपंच सपना सावंत यांची आत्मीयता.
घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी!
ग्रामसेवक जयराम नटवे यांची माहिती – ३१ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ; पात्र लाभार्थ्यांनी त्वरित अर्ज करावा.

श्रेयश वानखेडे:
सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी (ता. सेलू, जि. परभणी) गोरगरिबांच्या स्वप्नातलं पक्कं घर साकार होण्यासाठी केंद्र शासनाच्या घरकुल योजनेत महत्त्वाची संधी मिळाली आहे. घरकुल सर्वेक्षणा साठी मिळालेली अंतिम मुदत ३१ मे २०२५ पर्यंत वाढवण्यात आली असून, सरपंच सौ. सपना सुनील सावंत आणि ग्रामसेवक जयराम नटवे यांनी गावातील सर्व पात्र नागरिकांना त्वरित अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
सरपंच सपना सावंत म्हणाल्या, “गावातील एकही कुटुंब घराशिवाय राहू नये, यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी गावपातळीवर जनजागृती सुरू आहे.” ग्रामसेवक जयराम नटवे यांनी माहिती दिली की, “घरकुल अर्जासाठी नागरिकांनी आधार कार्ड, सातबारा, उत्पन्नाचा दाखला यांसारखी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि ग्रामपंचायतीमध्ये दाखल करावीत.” काशिनाथ गणपत उबाळे म्हणाले, “सपना ताईंच्या प्रयत्नामुळे आमचं घरकुलाचं स्वप्न आता पूर्ण होणार, ही खूप मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे.”
सुमित्रा रमेश सावंत म्हणाल्या, “ग्रामसेवक नटवे सरांनी प्रत्येक चौकात जाऊन लोकांना माहिती दिली. त्यामुळे अनेक महिलांनी आता अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.”ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच व ग्रामसेवक यांच्या नेतृत्वाखाली “गावातील कोणताही गरजू लाभापासून वंचित राहू नये” या हेतूने विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती उपसरपंच लहानआप्पा हरकळ यांनी दिली.