चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले आ. सुधीर मुनगंटीवार
खतांचा तुटवडा दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंपावर डिझेलसाठी स्वतंत्र कोटा द्यावा
आ. मुनगंटीवार यांचा पुढाकार; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत शेतकरी प्रश्नांकडे वेधले लक्ष
New Doc 05-19-2026 16.59New Doc 05-19-2026 17.00
Jyotsna Wankhede: जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या युरिया व DAP खतांचा तुटवडा तसेच शेतीकामांसाठी आवश्यक डिझेल उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी पेरणी हंगामाच्या पार्श्वभूमीवर या अडचणींमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना त्यांच्या मदतीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार सरसावले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत त्वरित उपाययोजनांची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत पुन्हा एकदा त्यांनी संवेदनशील लोकप्रतिनिधीची भूमिका अधोरेखित केली आहे.
आगामी पेरणी हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी शेतीच्या तयारीत व्यस्त असताना अनेक कृषी केंद्रांमध्ये खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुल तालुक्यातील ३२ कृषी केंद्रांपैकी केवळ २५ केंद्रांमध्ये युरिया आणि फक्त ९ केंद्रांमध्ये डीएपी उपलब्ध असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. बल्लारपूर तालुक्यातील १५ कृषी केंद्रांपैकी ९ केंद्रांमध्ये युरिया तर ७ केंद्रांमध्ये डीएपी उपलब्ध आहे. पोंभूर्णा तालुक्यातील ३७ कृषी केंद्रांपैकी २६ केंद्रांमध्ये युरिया आणि केवळ ९ केंद्रांमध्ये डीएपी उपलब्ध आहे. तसेच चंद्रपूर तालुक्यातील ६५ कृषी केंद्रांपैकी ३९ केंद्रांमध्ये युरिया आणि फक्त १९ केंद्रांमध्ये डीएपी खत उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांना खतासाठी विविध कृषी केंद्रांवर फेऱ्या माराव्या लागत आहेत.
आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अनेक भागांमध्ये कृत्रिम खत टंचाई निर्माण केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असून वेळेवर पेरणी आणि शेतीची कामे होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. पावसाळ्यापूर्वी शेतीची महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक असताना खत उपलब्ध नसल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व कृषी केंद्रांमध्ये युरिया आणि डीएपी खताचा पुरेसा साठा तात्काळ उपलब्ध करून द्यावा तसेच खतांचा काळाबाजार आणि कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आ.मुनगंटीवार यांनी प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर डिझेल उपलब्धतेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पाण्याचे पंप, जनरेटर, थ्रेशर आणि इतर कृषी यंत्रसामग्री चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज असते. मात्र अनेक पेट्रोल पंप चालकांकडून शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतीची कामे अडचणीत आली आहेत. दुर्गम आणि जंगल परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
ग्रामीण भागातील अनेक लहान आणि मध्यम शेतकऱ्यांकडे सर्व यंत्रसामग्री पेट्रोल पंपापर्यंत नेण्याची सुविधा नसल्यामुळे त्यांना कॅनमध्ये डिझेल नेण्याशिवाय पर्याय राहत नाही. अनेक भागांमध्ये विजेचा अभाव असल्याने डिझेल पंपाच्या सहाय्याने शेतीला पाणी द्यावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा किंवा इतर ओळखपत्रांच्या आधारे डिझेल कॅनमध्ये उपलब्ध करून द्यावे आणि प्रत्येक पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र डिझेल राखीव कोटा ठेवावा, अशी मागणीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
सर्वसामान्य कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणींना प्राधान्य देत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खत आणि डिझेल उपलब्ध होणे ही केवळ सुविधा नसून आगामी पेरणी हंगामाच्या यशाची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे संवेदनशीलतेने पाहत तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.









