श्रेयश वानखेडे:
शहरातील विकासाच्या दाव्यांना जोरदार धक्का बसला आहे. ब्रह्मपुरी नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेची पोलखोल करत पहिल्याच पावसाने संपूर्ण शहर जलमय केले आहे. नाली उपसा न झाल्यामुळे आणि नाल्या बनवण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आलेल्या पावसामुळे शहरात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे विकासकामांची पोलखोल झाली आहे. नगरपरिषदेकडून अत्यावश्यक कामे सोडून इतर कामे केल्याने पैशांचा अपव्यय झाला असून, आवश्यक उपाययोजना न केल्याने पावसाने गंभीर त्रुटी उघड केल्या आहेत.
शहरातील नाल्यांची सफाई न झाल्यामुळे पाणी साचून रस्त्यावर येत आहे, ज्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरात पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शहरातील रस्ते, बाजारपेठा आणि रिहायशी भागातील परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीने नगरपरिषदेच्या प्रशासनाची अक्षमता आणि नियोजनाचा अभाव उघड झाला आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ब्रह्मपुरी नगरपरिषदेला तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नगरपरिषदेकडून विकासाच्या नावाखाली इमारती उभारण्यात आल्या आहेत. सुस्थितीत असलेल्या रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण करण्यात आले, आणि राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तींच्या एका घरासाठी लाखो रुपये खर्चून रस्ते बांधण्यात आले आहेत. चौकाचौकात स्टीलचे स्टॅंडर्ड नामफलक लावण्यात आले आहेत. मुख्य मार्गावरील रस्त्याची जागा न सोडता लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहे, ज्यामुळे भविष्यात रस्ता अरुंद होणार आहे, मात्र पायाभूत सुविधा व जलनिस्सारण व्यवस्थेचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे पावसाच्या तडाख्यात शहरातील नगरपरिषदेचा विकास नागडा झाला आहे.
शहरातील नागरिकांनी या स्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे व नगरपरिषदेकडून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पावसाच्या काळात शहरात जलजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.