खड्ड्यांविरोधात वेंकटेश्वर प्रतिष्ठान तर्फे अनोखे आंदोलन.
रस्त्यावर रांगोळी काढून संताप व्यक्त.

ज्योत्स्ना वानखेडे : दि.06 रेल्वे स्थानक ते बसस्थानक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेलूतील श्री वेंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने रस्त्यावर रांगोळी काढून अनोखे आंदोलन करण्यात आले.या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघातांची शक्यता वाढली आहे. तसेच रस्त्यावरील धुळीमुळे परिसरातील दुकानदारांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून संताप व्यक्त केला. तसेच हे खड्डे तात्काळ बुजविण्यात न आल्यास किंवा नवीन रस्त्याचे काम सुरू न केल्यास ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.या आंदोलनात जयसिंग शेळके, गणेश शेवाळे, अक्षय सोळंके, नवनाथ गायकवाड, अण्णासाहेब शिंदे, दत्तात्रय कदम, संदीप पाजगे, रोहीत कोदली, उमेश तोडे, राजेभाऊ सागडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.