बल्लारपूरमध्ये वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा चाबूक; ६४४ वाहनचालकांकडून ४.८१ लाखांचा दंड वसूल
ज्योत्स्ना वानखेडे: शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाढते अपघात व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या स्पष्ट निर्देशानुसार जानेवारी २०२६ या महिन्यात विशेष वाहतूक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध नियमभंगप्रकरणी एकूण ६४४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातून ४ लाख ८१ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेल्मेट न वापरणे, सीट बेल्ट न लावणे, वाहन परवाना नसणे, विमा व पीयूसी प्रमाणपत्र नसणे, ओव्हरस्पीड, ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, चुकीच्या ठिकाणी वाहन पार्किंग करणे, साईड मिरर नसलेली वाहने तसेच नियमबाह्य वाहन बदल (मॉडिफिकेशन) अशा विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंगांवर ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या २२ वाहनचालकांवर स्वतंत्रपणे कठोर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाहनचालकांना मोटार वाहन कायद्यानुसार न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे जीवघेणे ठरत असल्याने, या प्रकारावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
ही विशेष मोहीम बल्लारपूर शहरातील प्रमुख चौक, राष्ट्रीय महामार्ग, बाजारपेठा, शाळा-महाविद्यालय परिसर तसेच वर्दळीच्या ठिकाणी राबविण्यात आली. काही गंभीर प्रकरणांमध्ये नियमभंग करणारी वाहने तात्पुरती जप्त करण्याची कारवाईही करण्यात आली.
सदर मोहीम पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा अजय खरकाटे, पोहवा राजु बगमारे, पोहवा नासिर अली,
पोअं प्रणय वानखेडे, स्वप्नील खोब्रागडे, राहुल चांदेकर, सौरभ मुन, मपोअं कल्याणी पाटील यांनी केले.
ठाणेदार बिपिन इंगळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भविष्यातही अशीच कठोर कारवाई सातत्याने सुरू राहील.” नागरिकांनी वाहन चालविताना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले आहे.